रविवार, 1 जनवरी 2017

कागभाषा -मूळ हिमाचली कथा -- हरनोट. प्रसिद्धी -- अंतर्नाद

कागभाषा

कावळ्याला माहीत होत आजी केंव्हा उठते ते. केव्हा उठते, केव्हा झोपते, केव्हा इतर काही-बाही करते. तो सकाळ फटफटण्याच्या आधीच अंगणापलीकडल्या पांगाऱ्याच्या झाडावर येऊन बसयचा. आजी बाहेर निघायची तो तिच्या हातात रात्रीच्या उरलेल्या पोळ्या-भाकऱ्यांचे तुकडे असायचे. त्यांना दोन्ही हातांनी चोळून-चोळून त्यांचा ती पार भुगा करायची आणि अंगणाच्या पू्र्वेला कधी काळापासून पडलेल्या दगडावर ठेऊन द्यायची. मग ती जरा बाजूला झाली की कावळा एका झेपेतच दगड गाठायचा आणि तो भुगा गिळू लागायचा.

ज्या दगडावर आजी जेवण ठेवायची तो चांगला लांब- रुंद होता. हा दगडही ती नियमान धुवून काढत असे. मंगळवारी तर इतर कावळ्यांनाही पर्वणी असायची. त्या दिवशी ती दगडावर जगर पेटवायची. आदल्या रात्री बनवून ठेवलेले मका आणि गव्हाच्या कणकेचे गोड- खारट रोट त्या जगरावर भाजायची. त्यावेळी अंगाऱ्यांवर घरगुती लोणीपण सोडलेल असायचं. असे भाजलेले रोट ती तुकड्या-तुकड्यांनी चहुदिशांना फेकायची. क्वचित कधी कावळे कमी आलेत असं वाटल तर स्वतःहून हाका मारायची - कागा,कागा, काव, काव... यारे बाबांनो.

झाडांवर गोळा झालेले कावळे अंगणात झेपावून रोटल्याचे तुकडे झेलत. त्यावेळी आजीच्या त्यांच्याशी खूप गप्पा चालत.

अशा या आजीची आणि कावळ्याची मैत्री गावात कित्येकांना खटकत होती. कावळे तिला नेमक काय सांगतात? गावात आजीच्याच पिढीतली काही मंडळी अजून जिवंत होती. ती सगळी आजीला चांगल ओळखत. म्हणत, अरे, तिचं मन पाण्यासारख निर्मळ आहे, शिवाय तिच्यावर देवीची कृपा पण आहे. पण नवीन पिढीत तिच्याबद्दल प्रवाद होते. हिला नक्की काहीतरी जादू-टोणा येतो. काही बायका म्हणतं, ही डायन तर नाही?

आजी या सर्वांकडे दुर्लक्ष करीत असे. तिचा दिनक्रम देखील बदलत नसे. तिच्याबद्दल कोण काय बोलतं ते तिला माहित असूनही ती कोणाला प्रतिवाद करीत नसे आणि कोणाला वेगळी वागणूकही देत नसे.

गावातली कुठलीही कामं असोत, तिथं आजी लागतच असे. लोक तिला हक्कान बोलावून न्यायचे आणि तीही जायची. कुणाकडे लग्न असेल, तिथ आजी. कुणाकडे कथा-कीर्तन असेल, तिथ आजी. कुणाकडे नव बाळ जन्माला आलं असेल, तिथ आजी. भांडण सोडवायला पंच कमीटी बसतं असेल, तिथ आजी आणि कुणाघरी मयत घडलं तर तिथही आजी. तिच्याशिवाय गावाच पान हलत नसे.

संध्याकाळी आजीकडे वेगळच दृश्य असायचं. जवळच्या मोठया गावच्या शाळेतून परतून येताना मुलं हमखास तिच्या घरी थांबणार. तिच्याकडे मुलांसाठी रोज काहीतरी निराळा खाऊ असणार. कधी मोसमी फळ, कधी सुका जर्दाळू, कधी गुळाचा तुकडा, कधी खरवस, एखादं मूल खूप भुकेजल असेल तर लोण्याचा गोळा आणि रोटी पण मिळायची. इथल्या विश्वात फक्त एक जात असायची- मुलांची. त्यांत आजीपण मूल होऊन जायची. जरा वेळान मुल तिच्या मागे लागत, आजी गोष्ट सांग. मग ती तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी ऐकवत असे. पण मुलांना सगळ्यात आवडायच्या तिच्या आजोबांच्या गोष्टी. त्यांना कागभाषा यायची. ते कावळयांशी बोलायचे. त्या गोष्टी आजी रंगवून सांगत असे. मुल विचारीत, आजी तुलाही येते का कागभाषा? ती म्हणायची, हात मेल्यांनो, मला अडाणीला कुठ काय येतय?

असे एक- दोन तास लहान मुलांच्या हसण्या-खिदळण्यात घालवल्यानंतर, त्यांच्या आवाजाची सोबत आजीला रात्रभर पुरायची. आजीच वय असेल पासष्टीच्या पुढेच, पण शरीरप्रकृती धडधाकट होती. एखाद्या पुष्ट पालीइतकीच ती पुष्ट आणि चपळ असायची. केस सगळे पांढरे झालेले. त्यांना आजी एका स्वच्छ रुमालान सदोदित बांधून ठेवायची. तिचे कपडे स्वच्छ आणि टापटिपीचे असायचे, जुने असतील, पण स्वच्छ धुतलेले. फाटके असतील, पण व्यवस्थित शिवलेले. एकटी असूनही आजीकडे एखाद्या जमीनदाराइतकी काम निघायची. तिच्याकडे तीन गाई, दोन वासर, सात शेळ्या, चार मेंढर आणि एक म्हतारा बैल होता. सगळ्याचं सगळ तीच करायची. एकुलता एक मुलगा होता, पण लग्नानंतर तो शेजारच्या दोधरी या गावी सासुरवाडीतच राहू लागला होता. सुनेला आजी आजीबात आवडली नव्हती. अगदी सुरवातीपासूनच.

लग्न होऊन सूनबाई या घरात आली, तशी त्या दोघींमधे एक भिंत उभी राहू लागली. सुनबाईला पडस-खोकला जरी झाला, तरी ती म्हणायची, म्हातारीन काहीतरी जादू टोणा केला. आजी गुपचुप आपली काम करी. सुनेची बडबड न ऐकल्यासारख दाखवी, फण असह्य झाली की गोठ्यात निघून जायची. मग एखाद्या गाईच्या खांद्यावर मान टेकवून अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची. अशावेळी कुठूनतरी तो कावळा यायचा. गोठ्याबाहेर रोवलेल्या त्या खांबावर बसून काव काव करायचा. आजी त्याला खायला कही फेकायची, पण ते तुकडे न उचलता तो काव काव करीत बसायचा. जणू आजीच दुःख वाटून घेण्यासाठीच तो आलेला असायचा.

त्याच्या कावकावीनं चिडलेली सुनबाई बाहेर यायची, दगड उचलून त्याच्या कडे भिरकावायची. तो तिथुन उडून पांगाऱ्यावर जाऊन बसायचा. तिथुन कावकाव करायचा दगड त्याच्यापर्यंत पोचू शकत नसत. मग सुनबाईचा जळफळाट वाढत जायचा, मेला माझ्याच दारावर का कर्र- कर्र करतोय? कोणत्या वाईट दिवसांना आमंत्रण देतोय? काय संकट आणणार आहे माझ्यावर कोण जाणे... कधी कधी आजी दुःखान तिला समजावयाची, असं म्हणु नाही बाई. पक्षी का कुणाच वाईट चिंतणार? तू त्याच्यावर दगड भिरकावण्याऐवजी भाकर-तुकडा टाक. पुण्य मिळेल.

सून म्हणायची, ऐका याचं एकेक. कावळे का कुणी घरात पाळतं? उलट ते शिवल्यान विटाळच होतो. अमंगल होत.

आजी म्हणायची, कावळ्यान कसा विटाळ होईल? इतर पक्ष्यांसारखाच तोही एक पक्षी. उलट तो इतरांपेक्षा जास्त गुणी, जास्त समजुतदार असतो, त्याला भली आणि बुरी माणसं ओळखता येतात.

आजीला कावळ्यांची भाषा येते की नाही, याबद्दल गावात तर्कवितर्क होते. आजी म्हणायची, कावळे हुशार असतात, खबरे असतात, गाव-परगण्याची माहिती ठेवून असतात. त्यांना चांगली वाईट वेळ कळते. नीट लक्ष देऊन त्यांच बोलणं कुणी समजून घेईल तर पुढली किती तरी अनिष् टळतील. लोकांना या फालतू बतावण्या वाटत. मग कधीतरी आजी एखाद्या अनोख्या घटनेबद्दल आधीच सांगन टाकायची. की पुन्हा गावात तिच्याबद्दल तर्क आणि शंकेला ऊत यायचा.

मुलगा सासुरवाडीला गेल्यापासुन आजी एकटी पडली. तो कधी-मधी येतो, पण दिवसांतल्या दोन-तीन तासांपुरताच. आजीला वाटत, त्यानं रात्री इथं रहावं. आपल्या हाताची तप रोटी खावी. रात्रभर जागन सुखदुःखाच्या गोष्टी बोलाव्यात, पण त्याला वेळ ही नसतो, आणि बायकोचा धाकही असतो. आजीला नातवंडांची आठवण येते, पण त्यांना देखील यायची मनाई आहे. मग क्वचितच आजीला शहरात जाव लागतं तेव्हा ती दोधरीला जान उभ्या-उभ्या सगळ्यांना भेटून येते.

आजीच घर तसं छोटसचं आहे. सहा खणांचं घर. दार पुर्वेकडे. खाली गुरांचा गोठा आहे आणि त्याच्यावर मजला चढवून घर. एक खोली बसा- उठायला. एक झोपायला आणि एकीत स्वयंपाकपाणी. खालच्या अंगणातून दगडी पायऱ्या चढून वर आल की आधी स्वयंपाक घर लागतं. घराच्या छपरासाठी लहान मोठे अवघड दगडच वापरलेले आहेत. अंगणातही तेच दगड बसविले आहेत. तिथुनच थोड खालच्या अंगानं उतरून गोठ्यात जाता येत.

अंगणात बसून आजीच्या तो़डून एक गोष्ट मुलांनी किती वेळा ऐकली आहे. गदी आग्रह करून. तिचे आजोबा याच घरात रहात. त्यांच्यामधे कित्येक गुण होते. त्यांना सगळे पंडितच म्हणत. कित्येक मंत्र तंत्र त्यांना यायचे. एकदा सकाळी अंगणात आंघोळीची तयारी चालू असतानाच एक कावळा झाडावर बसून काव काव करू लागला. त्यासरशी ते तडकून उठले, घरात येऊन बूट घातले, काठी घेतली आणि तरातरा चाल निघूनही गेले. एरवी डोक्यावर पगडी घेतल्याशिवाय कुठेही न जाणारा माणूस उघड्या अंगाच निघाला. चुलाण्यावर गरमं पाणी तसचं राहिल. शेवटी आजीने येऊन चुलाणं विझवल. त्यांना कुठे निघालात सं विचारायची सोय नव्हती. ते गावाबाहेर गेलेत, एक कावळाही उडत-उडत त्यांच्या पुढे जात होता, अशी बातमी एक गुराख्यानं दिली.

आजोबा तरातरा चालत, तर कधी धावतचं निघाले, ते थेट दहा मैलांवरच्या नातलगाच्या गावी, त्यांच्या घरासमोरच थांबले. मक्याच पीक काढण्याचे दिवस होते. आज त्यांच्या शेताची पाळी असल्यानं सगळा गाव सकाळपासनच त्यांच्या शेतावर काढणीसाठी राबला होता. आता कुठं दुपारच्या जेवणाला बसतं होते. माडीवर पंगत बसली होती.पत्रावळी मांडल्या होत्या. त्या दोन दोन डाव सातूचं पीठ वाढून झालं होतं. जेवणाऱ्यांनी पीठाचं आळ करून घेतल होत आणि दह्याच्या घट्ट लस्सीची वाट पाहत सगळे थांबले होते. तेवढयात आजोबांची आरोळी कानावर येऊन पोहचली, थांबा रे घेऊ नका कुणी लस्सी.

काश्याच्या भांडयाच्या खखणाटाइतकाच स्वच्छ आवाज मला आणि पंगतीत सर्व चिडीचुप झालं. कुणीतरी माडीवरून वाकून पाहिल तो पंडित. उघडयाबंब अंगावर घामाच्या धारा वाहत होत्या. धाप लागली होती, पण पुन्हा एकदा थांबा- थांबा अशी हाक देत ते सरळ अंगणात बसवलेल्या रांजणाकडे गेले. मोठया रांजणात पंचवीस शेर दुधाचं दही लावून ठेवल होत आणि त्याची आता लस्सी केली होती. आजोबांनी हातातली काठी णकन मारून रांजण फोडला. सगळी लस्सी वाहून गेली. वाक् गावकरी पाहतात तो रांजणाच्या तळात एक भला थोरला नाग मरून पडलेला होता. लस्सचा एक घोट घेणाराही जिवेत राहिला नसता. सगळ्या गावाचा मामला. किती हाहाकार माजला असता, त्याला सुमार नाही, पण या नेमधर्मी पंडितानं येऊन सगळयांना वाचवलं किंवा त्यांच्या पक्षीवाणीच्या ज्ञानानं वाचवलं, असं म्हणा.

गोष्ट ऐकता-ऐकता मुलांचे डोळे विस्फारले जात. आपण कुणाकडून शिकावी कागभाषा, असा प्रश्न एकमेकांना विचारीतं. मग आजी त्यांच्या तळहातावर गूळ ठेवत असे. पक्ष्यांशी प्रेमाने वागा, त्यांना निरखा एवढंच सांगत असे.

आताचा जमाना आजीला अजिबात आवडत नसे. घोर कलियुग, सगळीकडे पापच पाप. कोणाचचं मन स्वच्छ नाही. सगळ्यांचे आपापले स्वार्थ. कोणी मरो, कोणी जगो. आजी खंतावायची. गाव गावासारख राहिल नाही, माणसं माणसांसारखी राहीली नाहीत, तशी माणसं आता कुठे मिळायची? दया नाही, धर्म नाही, ममत्व नाही. सगळे एकमेकांचे वैरी. आधी गावात किती एकोपा होता. सगळे मिळून राह. एकमेकांच सुख-दुःख वाटून घेत. आता प्रत्येक जण स्वतःसाठी. आजीकडेही फारसं कुणी दुखलं-खुपलं िचारायला येत नाही.

दुपारची काम आटपली, की आजी एकटीच असायची. मग एखादी जागा पकडून बसत असे. कधी अंगणातल्या चिंचेच्या सावलीत, कधी दाराच्या उंबरठ्यावर, कधी गोशाळेच्या एखाद्या खुंट्याजवळ. मग विडी पेटवून दो- चार झुरके ओढायची. इतक्या जोरात की खोकल्याची मोठी उबळ घेऊनच धूर बाहेर पडायचा. खोकून-खोकून आजी लाल व्हायची, पण हातातली विडी फेकत नसे. थोडी शांत झाली की पुन्हा विडीचे झुरके. तिची गालफडं थरथरायची. चेह-यावरील सुरकुत्यांनी जाळी विणली जायची. एक विडी ओढून आजी बसल्या जागीच आडवी व्हायची. झोपेत लांब कुठल्यातरी काळात संचार करून यायची.

गाव अजून शहरी झाल नव्हतं, तेव्हाची गोष्ट निराळी होती. लोक संस्कार मानीत असत. कथा-र्तन व्हायची. कुठं लग्न असलं की गावोगावच्या गोळा झालेल्या नात्यागोत्यातील बायका आजीच्या मागे लागायच्या, आजी गाणं म्हण. आजीला फार आग्रह लागत नसे. तिची गाण लगेच तयार असत.

जर्दाळू आणि रसभरे खजूर

कुणाच्या थंडगार बागांमधले रे

नवऱ्या मुला तुझ्या नवरीचं

ऐश्वर्य बघून घे रे

बाप तिचा दिल्लीचा राजा,

आई तिची दिल्लीचा राणी,

पण पोरीला किती लांब दिली रे

आजीला माहीत असायचं कोणत्यावेळी सुहाग गायचा, आणि कोणत्यावेळी उलाहना. या हिमालयाच्या कुशीतल्या प्रदेशामध्ये प्रत्येक वेळेसाठी वेगळं गाण असतं. मुलाकडून गायचा सुहाग वेगळा, मुलकडून गायचा वेगळा. पण आताच्या मुली- सुनांना हे काहीच शिकवल जात नाही. त्यांना माहीतचं नाही सुहाग कसा गातात. आजीची चिडचिड व्हायची. आताच्या लग्न सोहळ्यात पूर्वीसारख कुणी बधाई गात नाही की सिठणी देत नाही. आता त्यांच्या जागी आली आहेत फिल्मी गाणी, कुणी गायची गरज नाही. टेपरेकॉर्डर लावून दिली की झालं. मग माकडासारख वेडं -विद्रं नाचायला हे तयार, मुल तर दारूच्या बाटल्या रिचवून नाचणार. आजी मनातल्या मनात शिवीगाळही करायची. हे फुकाचे नाच करा रे.

काही नव्या मुली तिच्यामागे लागतं, आजी तू पण नाच ना आमच्याबरोबर. मग मात्र आजीला उठून निघून याव लागायच. गिद्धा नाचायचा असता तर नाचली असती. दूर-दूरच्या गावांपर्य तिच्यासारख्या गिद्धा नाचणारी बाई नव्हती, पण आताच्या नाचात फलतू अंग हलवण्यापलीकडे काहीच नाही, गिद्धा हरवून गेला आहे

अजूनही आजीचे नियम मात्र आजी पाळत होती. संक्रांत आली की सगळ्यांत आधी तीच मंदिरात पोचायची. एका मडक्यात गोरस आणि कोऱ्या कापडात बांधलेल सव्वा शेर पीठ पुजाऱ्याला द्यायची. देवीच्या पुढयात माथा टेकायची. पुजारी अक्षता व प्रसाद देईल तो पदरात बांधून घ्यायची. देवीची पंची पूर्ण होईपर्यत तिथेच थांबायची.

पण आता त्यासाठी पंच सुद्धा वेळ काढून येत नसत. गेली कित्येक वर्षे सगळे पंच उपस्थित राहिले, असं कधीही झालेलं नाही. सगळे गावकरीही येत नसत. जत्राही नीट होत नसे. आणि भंडारही होत नसे.

आजीच्या नजरेन टिपल होत की, मंदिराची कितीतरी जमीन पुजाऱ्याशी संगनमत करून लोकांनी बळकावली होती. देवीला चढवलेले सोन्या-चांदचे दागिने लग्न मुंजीत पुढाऱ्यांच्या लेकी सुनांच्या अंगावर असायचे. दागिने तर दागिने, पुजारी आणि सरपंचाने देव-देवींच्या कितातरी मूर्ती गुपचूप विकल्या होत्या, पण देवाच्या प्रतिनिधीला कोण काय विचारणार? म्हणून तर हल्ली देवता गावत राहून गावाच रक्षण करीत नाही. म्हणून गावात अशांती आहे. रोजची लफडी. हल्ली तर वाघही गावात येऊन उच्छाद मांडू लागलेत. परवाच एका गावकऱ्याचा तगडा बैल बिबळयाने मारला. आजीने चार-पाचदा खूप प्रयत्न केला की, गावान एकत्र येऊन या प्रश्नांवर चर्चा करावी. हव असल्यास देवीचा कौल घ्यावा, पण तिच ऐकायला कुणालाच फुरसत नव्हती. बिचारी आजी देवाला विनवायची, बाबारे सगळयांच अरिष् थोपवून धर.

काही दिवसांपातून आजी काही चित्र-विचित्र गोष्ट सांगू लागली आहे. तिच्यावर कोण विश्वास ठेवणार? पण मग कहीतरी घटना अशी घडते की, तिच्या बोलण्याची प्रचीती येते. गाव बुचकळयात पडत चालचं.

एक दिवस आजीनं एका गवत काढणाऱ्या बाईला सांगितल की, गावाच्या पाटलान मंगलूचा खून केला आहे. बाई घारली. आजीन तिला हे का सांगाव? हा नसताच उपदव्याप, पण एवढी मोठी गोष्ट तिच्या पोटात तरी कशी टिकणार? गावात चर्चा झाली. विश्वास ठेवावा की न ठेवावा? लोकांना हे माहित होत की, मंगलू झाडावरून पडून मेलेला आहे. एक दिवस गावाबाहेर त्याचं प्रेत झाडाखाली पडलेल मिळालं. शेजारी त्याचा कोयताही होता. झाडावर जळणासाठी लाकूडफाटा तोडायला चढला असणार आणि पाय घसरून पडला असणार.

पण आजीला माहीत होत त्याचा कसा आणि कुणी केला ते, जिथे त्याचं शव सापडल ती जागा तिच्या घरापासुन फर्लांगभर होती. अर्ध्या रात्री कावळा अचानक बोलला म्हणून ती जागी झाली. पायांत बूट घालून अणि हातात कोयता घेऊन बाहेर आली. धूसर चांदण पसरल होत. आवाजाच्या दिशेनं हळूहळू जात आजी त्या जागेजवळ येताच एका झाडामागे लपून पाहात बसली. पाटलाच्या माणसांनी पोत्यात भरलेल मंगलूचं शव बाहेर काढल आणि तिथं टाकून ते पसार झाले. एका माणसाने झाडावर चढून थोड्या फांद्याही तोडल्या होत्या आणि तिथंच पसरल्या होत्या.

आजी ते दृश्य पाहून वेडपिशी झाली. मंगलू पन्नाशीच्या आसपास होता. गावात एकटाच राहायचा. त्याचा मुलगा मोठया शहरात पोस्टात नोकरीला होता. मंगलूच्या जमीनीला चांगल्या पाण्याची विहीर होती. त्या जमीनीवर पाटलाचा डोळा होता. त्यासाठी पाटलानं त्याला भरपूर दारू पाजून जमिनीच्या कागदावर त्याचा अंगठा घेतला आणि त्याला मारून टाकल.

पाटीलच ग्रामपंचायतीचा सरपंच होता. गावात त्याच्या विरूद्ध बोलायची हिम्मत कुणाची? पण बघितलेली घटना मनातच साठवून ठेवणं आजीला शक्य नव्हतं. मंगलूचा मुलगाही चक्रावला होता. बाप मेला कसा अचानक? मुलगा तगडा जवान होता. आजीनी त्यालाही सगळं सांगून टाकल.

ठाण्यात रिपोर्ट आला. तिथले पोलिस तर पाटलाच्या घरचेच, पण चौकशी केली असं तर दाखवायला हवं. पोलीस गावात आले. चावडीवर सगळयांना गोळा केल. जबान्या लिहून घेतल्या, पण कुणी काही शंका काढल्या नाहीत. मंगलू झाडावरून पडून मेला, असाच निष्कर्ष निघाला. पोलिस एन.सी. करायला मोकळे झाले.गर्दीत आजीही बसली होती. मनात अंगारे फुलून येत होते, पण पोलिंसांसमोर आपण कसे बोलावे? तिनं एक विडी शिलगावून जोरजोरात रके घ्यायला सुरवात केली. धूर ठाणेदारापर्यत पोचला तशी त्याने दखल घेतली, ए म्हतारे, काही सांगायच आहे का तुला?

आजीने विडी जमीनावर अशी जोरात घासली, की तिचा पार भुगा होऊन ती मातीच्या रंगाची झाली. उठून पायानी जमीन सारखी करीत ती म्हणाली, बेटा मी तुझ्या आईच्या वयाची असेन, माहीत आहे,, तू मोठा ऑफिसर झालास. पण ऑफिसरांना काही नम्रपणा िकवतात की नाही? घरी आईशी असाच बोलतोस का रे तू?

गावकरी स्तब्ध झाले. ही म्हतारी पोलिसांना असे ऐकवत्येय? ठाणेदारही क्षुब्ध झाला. हा एखादा बाप्या असता तर दाखवला असता पोलिसा इंगा, पण बाईमाणसाला काय करावं.

आजीनेच ती स्तब्धता मोडली. म्हणाली, मंगलूचा खून झाला आहे ठाणेदार. चौकशीला आला, तर जरा नीट चौकशी कर.

ठाणेदार गडबडला. आजी इतकं स्पष्ट बोलेल हे कुणाला माहीत होत? आता पाटील कसा वाचणार? पाटीलही गार पडला होता, पण अवसान आणून म्हणाला, म्हतारी वेडसर आहे सरकार, तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.

ठाणेदाराने एक नजर त्याच्यावर टाकली, एक आजीवर. हे प्रकरण दाबण आता तितकसं सोप राहणार नाही. तो जागेवरून उठला आणि आजीजवळ येत आदबीन म्हणाला, माताजी तुम्हाला कस ठाऊक?

आता कुठं हा पोलीस अंमलदार माणसासारखा झाला होता, माणसासारखा बोलत होता. आजी त्याच्याकडे पाहून गुरगुरली, अरे पाटलालाच का विचारीनास. त्याच्याकडे काल रात्रभर मटन, कोंबडी आणि दारूच जेवण जेवत बसला होतास. किंवा या मंगलूच्या नातेवाईकांना विचार. पैसे खाऊन बसलेत, बोलणार नाहीत, पण विचार त्यांना. मंगलू मेला त्या दिवशी हे कुठे होते...तो पडून मेला नाही ठाणेदार, या पाटलाच्या घरीच त्याचा खून केला गेला आणि या नातेवाईकांनीच त्याला पोत्यात कोंबून रानात आणून टाकलं.

बोलता-बोलता आजीचा गळा भरून आला आणि ती रडू लागली. ठाणेदारमधला माणूस जागा होऊ लागला, पण तसं झाल तर ठाणेदारी कशी निभवणार? त्याने आपले कागद गोळा करून सोबतच्या पोलिसाकडे दिले आणि जाताना म्हणाला, तुम्ही कीत येऊन जबानी देऊन जा.

एवढं बोलून आपली सुटका करून घेत तो निघून गेला. गाव आजीकडे पाहत राहीला. पाट ओरडला, म्हतारे पाहून घेईल तुला पण.

आजी हसली. एखाद्या निष्पाप मुलीप्रमाणे मनात साठलेल बाहेर आल तसं ती पण आतून हलकी झाली होती. लोकांना वाटल आता ही पाटलाला काहीतरी चांगल ऐकवेल, पण तीनी आणखी एक विडी कनवटीतून काढली आणि पाटलाकडे फेकत म्हणाली, अरे घे रे पाटील, विडी घे. अरे, माझ्या बाईच्या सांगण्यानं काय होतयं? मी तर वेडसर. तुला कोण पकडून देऊ शकणार?

दुसरी विडी शिलगावत आजी चालू लागली. गावात चर्चा सुरू झाली की ही खुनाची घटना अगदी डोळयांनी पाहावी तशी आणि फक्त आजीलाच कशी कळली?

कित्येक दिवस गेले आजी कधी स्वतः पोलिस चौक गेली नाही की तिला चौकतून बोलावण आलं नाही. कित्येक दिवस पाटलही गावातून गायब होता. पंचायतीमधल कामही सरपंचच नाही म्हटल्यावर खोळंबून राहिल.

तेवढयात निवडणूका लागल्या. मग लोकांचा चर्चेचा विषय बदलला. मंगलूचा मुलगा शहरातून गावी आला, पण गावात निवडणुकीत काय होत, ते आजीला माहीत होत. इथं मतांसाठी भरमसाठ वायदे करून गेलेले लोक पुन्हा दुसऱ्या निवडणुकांपर्यत तोंड दाखवणार नाहीत.

एक दिवस घरातली सकाळची कामं आटोपून आजी खालच्या अंगणात उतरली, तर बरेच लोक आत येताना दिसले. त्यांच्या हातात लाल-हिरवे झेंडे होते. पाटिलही त्यांच्य़ा बरोर होता. अंगणात पोचताच काही झेंडे त्यांनी तिथे रोवले. पाटलान आजीला नमस्कार केला. आजीन पण स्मित केलं. जणू काहीच झाल नव्हतं.

पाटील त्याच्या पार्टीसाठी मत मागायला आला, हे उघड होत. एका शहरी माणसानं सुरवात केली, आजपासून नवव दिवशी मतदान आहे. आमच्या पार्टीवर आपली मेहरबानी ठेवा.

आजीन हसून म्हणलं, आम्ही गावठी लोक. गावातली गोष्ट गावातच ठेवतो. तू शहरी आहेस. तुला माहीत नसेल. वाटलं तर पाटलाला विचार.

पाटील थोडासा ओशाळवाणा हसला. म्हतारीच्या बोलण्याचा रोख कळत नव्हता. तो आपली पोपटपंची चालू ठेवत म्हणाला,, हे आपलं निशाण आहे आजी, यावर मोहर उठवायची .

मघाचा शहरी माणूस समजावत म्हणाला, आपली पार्टी रामासाठी लढते आहे. आपण रामासाठी मंदिर बांधणार. आज त्याच्या डोक्यावर छप्पर नाही. ते आपण त्याला देणार. बघाच तुम्ही.

आजीच स्मित हरवल, चेहरा रागाने लालबुंद झाला. तू मंदिर बांधणार? त्या जगाच्या रक्षणकर्त्याला तू छप्पर पूरवणार? पण जाऊ दे, तू नवीन आहेस. मी आपल्या या सरपंचाला विचारते. गावातल्या देवळाकडे कधी बघितलसं? त्यांच छप्पर उडाल आहे, पावसाचं पाणी आत जात. जुन लाकडी काम प़डत चाललय. ते दुरूस्त करायला पैसे नाहीत म्हणतो? बरोबर, कसे असतील पैसे? देवाचे सोन्या चांदचे दागिने लुबाडलेत. मूर्त्या विकल्यात. सत्यानाश चालवला आहे. अरे, गावातल्या देवाला वाचवू शकत नाही तुम्ही, आणि निघालेत रामाच मंदिर बांधायला, त्या परमेश्वराला वाचवायला?

क्षणभर सगळे गप्प झाले. तेवढयात त्या माणसाने नवीन मुद्दा सुरू केला, माताजी आम्ही आपल्या वृद्धावस्था पेन्शनची सोय करू.

आता आजी पुन्हा सहज होत चालली होती. हसून म्हणाली, ती तर मला कधीचीच चालू झाली आहे बेटा. झाली आसतील पाच वर्ष.

त्या माणसान मध्येच आपला मुद्दा दामटला, पाहा, आमच्याच सरकारनं ...

त्याला डवत आजी म्हणाली, ते पेन्शन मला मिळत नाही बेटा. शहरी माणूस अवाक् झाला, गोंधळला. म्हणजे? कुठे जात ते पेन्शन?

इतरांना समजले नसे, पण पाटलाचा चेहरा काळाठिक्कर पडला. शहरी माणसानं पुन्हा विचारल, पेन्शन कुठे जात माताजी?

आजीचा चेहरा पुन्हा रागेजला. तिनं पाटलाकडे असे पाहिले जसा एखादा वाघ आपल्या शिकारीकडे बघतो. तुमच्या सरपंचालाच का नाही विचारत? माझ्या नावाची पेन्शन याच्या बायकोला तर दा केली जाते.

आता सगळ्याच्याच पायाखालची माती सरकायला लागली. एकेक करून सगळे काढता पाय घेऊ लागले. त्यानंतर इतर बऱ्याच पाटर्याचे लोक आले. गावातले त्यांचे त्यांचे लोकही बरोबर असायचे, पण आजीच्या अंगणाकडे कुणी फिरकल नाही.

निवडूणूकीत सपंचाची पार्टी हरली. त्याची काळजी वाढली. एकीकडे मंगलूची केस, दुसरीकडे आजीने सर्वांसमोर उल्लेख केलेली मूर्तीची चोरी आणि वृद्धपेन्शन केस गावकऱ्यांच्या चर्चेतून जात नव्हती. त्याच्या राज्यात या सगळ्या गोष्टी तो पचवू शकत होता. गावात आणि इतरत्र अशी मंदिर होती, जी पांडवकालीन मानली जात. लोक म्हणत, की या मंदिरातले भारी भक्कम अवघड लाकडी किंवा दगडी खांब फक्त भीमच इथे आणू शकला असता, पण आता ती मंदिर आतून रिकामी होऊ लागली आहेत आणि कदाचित देशाबाहेरही जात आहेत. मग या देशात अनर्थ नाही तर काय होणार?

सरपंचाची काळजी वाढली होती. म्हतारीला जर एवढं माहित आहे, तर अजूनही बर माहीती असणार. कोणतं कर्णपिशाच्च तिला वश आहे, की हे सार तिला आधीच कळत?

एक मध्यरात्री आजीची झोप अचानक उघडली. बाहेर कावळा ओरडत होता. त्याच्या नेहमीच्याच झाडावर बसून. आजी तात्काळ उठली. काव काव नेहमीपेक्षा वेगळीच होती. आजी तशीच बाहेर आली. अंगावर दुपट्टा नाही, क्यावर रूमाल नाही, पायांत बूट नाही. तशीच पळत खाली येऊन दावणीला बांधलेली गुर मोकळी केली. त्यांना गोठयाबाहेर हाकलून दार घट्ट बंद केल. आता त्यांना परत आत जाता णार नव्हत. तिथून विजेच्या वेगाने पळत आजी निघाली ती सरळ दोधरी गावी मुलाच्या घरासमोर ऊनच थांबली. इकडे मिनीटभरातच तिच्या घरान पेट घेतला. दोधरीला पोचेपर्य ज्वाळांचा उजेड आजीचा पाठलाग करत होता. आजीन मुलाच दार ठोठावल. झोपेतूनच उठत सुनेनं विचारल, कोण आहे? मुलगा बहूधा परगावी गेला असावा.

मी आहे सुनबाई, दार उघड पटकन.

सुनेनं आवाज ओळखला. तिची सासु, तिन आय़ुष्यभर दुस्वास केलेली सासू. मुलंही जागी झाली. थोरल्या मुलीन आवाज ओळख आईला विचारल, आई आजी आहे, दार उघडू?

सुनेन तिला दटावल, चूप. एवढया रात्री कोण कुठली आजी. नक्कीच डायन असणार. झोप गुपचुप.

आजी हे ऐकून अंतर्यामी स्तब्ध झाली. बराच वेळ दाराशी बसून अश्रू ढाळत राहीली. मग पहाट फटफटू लागली तशी तिथ निधून गेली. कुठे? कुणास ठाऊक. त्यानंतर तिला कधीच कुणी पाहिल नाही.

इकडे पेटत्या घरासमोर गावातली गर्दी गोळा झाली. ज्वाळांचा आवेग तीव्र होता. आत जायची कुणाची हिम्मत होईना. आजी आणि गुर जळून मेली म्हणून लोक हळहळली. पेट्रोल टाकून एवढी मोठी आग कोण टवू शकत ते लोकांना कळत होत. सरपंच माजी झाला पण त्याला कशाची कुणाची डर नाही, असाच विचार त्याच्या मनात होता.

आग विझली तो पर्य उजाडल होत. गावच्या स्त्रिया, मुल, बाप्ये, इतकच काय तर माजी सरपंचदेखील अश्रू ढळत होता. पलीकडच्या झाडीवर बसून कावळा काव काव कोकळत होता. रात्रीची घटना त्याने पाहिली असणार, त्याची कागभाषा कुणाला कळणार? आजीसारख को उरल आहे आता गावात?

दिवस गेले, महीने जाऊ लागले आणि लोकांनी पाहिल, माजी सरपंच दिवसेंदिवस खंगत चालला आहे. झपाटयान. सगळी संकट पचवून झाल्यावर आता हा का खंगतोय?

पण सरपंच कुणाला काय सांगणार की त्यांन कित्येकदा मध्यरात्री आपल्या अंगणाच्या बांधावर आजीच भूतं विडया ओढत बसलेल पाहिल आहे.

-----------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: