रविवार, 15 जून 2014

आजही द्वारिका

आजही द्वारिका

श्रीकृष्णाने सकाळची सर्व कामे आज लवकर संपवली होती. राजसभेतील चर्चेतही फारसा भाग घेतलेला नव्हता. आजचा दिवस निर्णायक असेल असे राहून राहून वाटत होते. होऊन जाउ दे तसेच. घेऊन टाकायचा काही तरी निर्णय. ही अनिश्चिततेची स्थिती कधी तरी संपायलाच हवी. “ती माझ्याशिवाय कोण संपवणार? श्रीकृष्णाने मनाला विचारले. 

हस्तिनापुरीची शिष्टाई  निष्कळ ठरली होती. ती तशीच ठरावी अशी द्रौपदीची इच्छा होती. युधिष्ठिराने युध्द टाळावे यासाठी प्रस्ताव केले होते. राजसूय  यज्ञ करणा-या मोठ्या साम्राज्याच्या सम्राटाने फक्त पाच गावांचे राज्य दिलेत तरी चालेल असा निरोप काका धृतराष्ट्र यांना पाठवला होता, त्यावर सुईच्या आग्रभागावर टिकेल एवढी जमीन सुध्दा देणार नाही असे म्हणत दुर्योधनाने तो प्रस्ताव धुडकवून लावण्यास धृतराष्ट्राला भाग पाडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सामोपाचाराचा प्रयत्न करावा  म्हणून युधिष्ठिराने शिष्टाई साठी कृष्णाला गळ घातली होती. तेव्हासुध्दा युद्ध टाळावे हीच भूमिका व पाच गावांवर समाधान मानू हाच निरोप कृष्णामार्फत देण्याचे ठरले होते. 

पण द्रौपदी आपले मोकळे सोडलेले केस हातात पुढे धरून त्याच्यासमोर ठाकली होती. दुःशासनाने  तिचे मोकळे  केस धरून  फरफटत सभागृहात आणले आणि भरसभेत अपमान केला ते शल्य विसरणे कसे शक्य होते?  “कृष्णा, हे मोकळे केस बघ,  दुःशासनाने केस धरून सभेला आणले तेव्हा भीमाने प्रतिज्ञा केली  होती की दुःशासनाचा वध करून त्याच्या रक्ताने तुझे केस माखून तुझी वेणी घालून देईन । ती प्रतिज्ञा भीम  विसरलेला नाही - मी ही विसरलेली नाही . पण आता युधिष्ठिर शांतीचा व युद्ध टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. युद्ध झालेच नाही तर ती प्रतिज्ञा अपुरी राहील आणि जन्मभर मला मोकळ्या केसांनीच वावरावे लागेल.” 

अवाक् होऊन सर्वजण ऐकत होते. युधिष्ठिराच्या शब्दाविरूध्द बोलण्याची प्राज्ञा इतर चार पांडवांची नव्हती . पण द्रौपदी म्हणजे सळसळती वीज होती. एरवी मेघांच्या पोटांत दडून राहणार - शांत, गुप्त, पण प्रकट झाली की क्षणार्धात सर्वांना लखलखाटाने दिपवून टाकणार. तिच्या तेजापुढे  प्रसंगी कृष्णाला ही नमते घ्यावे लागले होते, मग युधिष्ठिराची काय कथा?
                                 
कृष्णालाही द्रौपदीचा मुद्दा मान्य होता. (कुन्तीचे मत ??)
शिष्टाईला गेलेल्या श्रीकृष्णाच्या अपेक्षेप्रमाणेच दुर्योधन  वागला होता.
                                  2
मसूरी 1984.
गेल्या महिनाभर तयारी  करीत असलेली , तरीही जराशी सुस्तावलेली लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकादमी सकाळपासून गजबजून गेली होती. नवीन बॅचचे प्रोबेशनर्स सकाळपासून निरनिराळ्या वाहनातून येऊ लागले होते. कुणी  चक्क यूपी स्टेट ट्रांस्पोर्टच्या बसमधून तर कुणी टॅक्सी, कुणी एसी कॅब व कुणी पालकांच्या आलीशान गाडीने प्रवास करून येत होते. देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या तरूणी- तरूण मंडळींचा  उत्साह ओसंडून वहात होल. आणि का नाही? देशाच्या सर्वोच्च सिव्हिल सर्व्हिस परिक्षेतून निवडलेली क्रिम आफ क्रीम अशी ही मंडळी होती . 
अणिमा आणि राधा  चेन्नईहून एकत्रच आल्या होत्या. रेलवे स्टेशनवरच त्यांची गाठ पडली होती, आणि त्यांना एकमेकींची साथ मिळाली म्हणून दोघींच्या पालकांना हायसे वाटले होते. अणिमा ही एका केरळच्या एका खेडेगावांतली मुलगी- शिक्षणासाठी त्रिवेंद्रम पर्यंत जाऊन आलेली.  तिथे मामाच घर बरं की कॉलेज बरं.  पण परदेशस्थ चुलत  भावाच्या प्रेरणे ने आय. ए. एस होण्याचे स्वप्न 
मात्र पाहिले होते आणि स्पर्धा परिक्षेची नीट तयारी करवून घेणारे शिक्षकही लाभून गेले होते. 
रेलवेचा हा सर्व प्रवास तिला नवखा होता.  फारशी काळजी किंवा चिंता करण्याचा तिचा स्वभाव नाही, पण गाफील राहूनही चालणार नाही या जगात.  आज एक खेड्यातली मुलगी भारताच्या एका टोकापासून प्रवास करून दूस-या टोकाला जात होती. पुढेही निरनिराळे प्रदेश हिंडावे लागणार होते. राष्ट्रगीतातल्या वर्णनाप्रमाणे पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण भारताचा पट्टा, ओडिसा, बंगाल, आसाम, असे सर्व प्रदेश तिला पहायला मिळतील या कल्पनेने ती सुखावली होती.
--------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: